सौजन्याची ऐशी-तैशी!

ही पोस्ट साऱ्या फुल्या फुल्या फुल्या वगळून!

कधी एकदा एक दिवस असा "नडेल त्याला तोडेल" टाईप येतो की तुम्ही दुर्लक्ष करण्याच्या मनःस्थितीत नसताच, आणि तेही अगदी विनाकारण. म्हणजे ना काम अडलेलं असतं, ना मॅनेजर उखडलेला असतो. पण तुमचं डोकं उडालेलं असतं.
मग ते झेब्रा क्रॉसिंगवर गाड्या उभ्या करणारे असो, किंवा ज्यांच्या अनपढ आई-बापानं त्यांना सिग्नलच्या बाबतीत १० सेकंद म्हणजे ० सेकंद असं काहीसं गणित शिकवलंय ते असो. स्टेशनच्या सब-वे मध्ये असलेले थिल्लर आणि छपरी लोक, गाड्या लेट होणं, पचापच थुंकून लाल झालेला प्लॅटफॉर्म, रेल्वे ट्रॅकवरचा गू, त्या गू वर बसलेल्या त्या माशीने उडून बाजूच्या वडेवाल्याच्या हातावर घोंघावणं वगैरे सगळं अगदी नॉर्मल झालंय आपल्यासाठी. माझी एक तीव्र ईच्छा आहे, मला ना एकदा त्या ऑटो वाल्यांना छळायचंय येता-जाता रस्त्यात त्यांची गाडी अडवून, "रेस कोर्सला जाणार का?" तो "हो" म्हणाला की "जा की मग" म्हणायचं. वाद झालाच तर उलट प्रश्न करायचा, "आमच्या वाटेने आम्ही जात असताना तुम्ही येतातच ना आपली घालायला?"

मग ते पाणी वाल्याने १५ रुपये MRP असलेली बाटली २० रुपयाला विकणे काय, २५ रुपये MRP असलेली लस्सी ४० ला विकणे काय, त्या चिक्कीवाल्यांमध्ये रेल्वेच्या डब्यांची वाटणी, मग त्यात दमदाटीही आलीच. भेळ खाऊन कागद खिडकीबाहेर टाकणारा एक तरी असतोच. मंकी हिल ला गाडी थांबली की लोकांची माणुसकी जागी होते,मग तिथल्या माकडांना काहीतरी उरलेलं खायला देणं आलंच. आपण त्यात त्यांचं बेसिक सर्वाईवल इंस्टिंक्ट संपवतोय वगैरे असले विचार मैलभर लांब असतात. पैसा फेको, तमाशा देखो वाल्या लोकांना काय कळणार हे सगळं. मग, ट्रेनमध्ये पैसे न दिल्याबद्दल तुम्हालाच काहीतरी वाईट बोलून जाणारे भिकारी आलेच. अरे तुम्ही भिकारी आहात, पण मीही श्रीमंत नाही ना, मी का पैसे देऊ तुम्हाला? Thats entirely your problem.
कधीकधी तर वाटून जातं की रेल्वेत RPF आणि TTE  पेक्षा जास्त अथोरिटी हिजड्यांची आहे. ४ टाळ्या वाजवून पैसे गोळा करणे हे त्यांचं काम. पण मला ते अक्षरशः एक्स्टोर्शन वाटतं. ते भयंकर प्रकार असतात. एखाद्या तरुणाला पैसे दे नाहीतर पाय वर करून तोंडाजवळ साडी वर करेन वगैरे असल्या धमक्या चार-चौघात देऊन १० रुपये घेऊन जाणे ह्याला दुसरं काय म्हणायचं? हीच गोष्ट एखाद्या मुलीच्या बाबतीत झाली तर त्याकडे एवढा कानाडोळा होईल का? हे प्रश्न वेगळेच आहेत. पोरगंही शहाणं झालेलं असतं, १० रुपयात वेळ मारून नेतं. ह्यासाठीच मला वरचा बर्थ आवडतो.
बिनपावती ५० रुपये आणि पावती हवी असेल तर ८० रुपये होतील असं एकदम प्रोफेशनली सांगणारा TTE. वाटून जातं की काय abuse केलाय सगळ्या गोष्टींचा.

नेमकं असल्यात अजून कुणी नग समोर आला की मग त्याला पडायची शक्यता जास्त असते.
माझंही तेच झालं आज. रेल्वेत हे असे असंख्य प्रकार रिचवत कसतरी कल्याण येत होतं. कर्जतच्या नंतर एक पंचवीशीतला तरुण आला. त्याच्या पॅन्टमधून ढुंगणाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग डोकं (की ढुंगण म्हणू?) बाहेर काढू पाहत होता. लालसर डोळे, दारूचा भपकारा, पँटच्या खिशात सिगारेटचा बॉक्स वगैरे. हातात पाण्याची घाणेरडी बॉटल, प्लास्टिकच्या पिशवीत साधारण काल किंवा परवा शिजवलेला भात. चहाचा कप. पायात स्लीपर. दाराजवळच्या कुपेच्या अप्पर बर्थला चढला. पाय तसेच खाली लोंबकळत सोडलेले. माझी बाराखडी मनातल्या मनात तेव्हाच चालू झाली. एक डुलकी झाली, वांगणी-बदलापूर दरम्यान कुठंतरी असू, अप्पर बर्थ वर बसून, ऐटीत टिचकी मारून साहेबानं चहाचा कप खाली लोकांच्या पायाजवळ उडवला. ठीक, जाऊ दे. कल्याणला लोक उतरायला दाराजवळ जमा झाले तरी त्याचे पाय खालीच. स्वतःच्या गर्लफ्रेंडचा एकंदर discomfort पाहून एका सुजाण पोरानं त्याला हटकलं, पाय वर गेले. बरं वाटलं. सगळी गर्दी उतरली की मी टुणकन उडी मारून खाली आलो, चप्पल सरकवली आणि दाराकडे निघालो. काही लोक घाईत गाडीत चढले होते, त्यात त्या साहेबांच्या बरोबर खाली एक पोरगी येऊन बसली. का देव जाणे, साहेबांनी अलमोस्ट माझ्या पायावर शिळा भात सांडला. मग मात्र सटकली.
"काय करतोय रे?" पासून माझा पट्टा जो काही चालू झाला ते त्यानं "कचरा किया तो तेरा क्या जात है?" असं मला विचारल्यावर फुल्यांवरच थांबला. स्वतःचा उगरलेला हात तब्बल ३ वेळ आवरता घ्यावा लागला. शेवटी त्याला गाडीतून खाली उतरवून २०-२५ लोकात चांगल्या दणदणीत आवाजात धमक्या देऊन हकलावल्यावर शांत झालो.

वड्यावरचं तेल वांग्यावर उतरायचंच होतं. कल्याणला लोकल मध्ये चढून ठाकुर्लीला उतरायचं म्हणून साईडला थांबलो. फ्रंटला एक छपरी लटकत होता. एकदा थुंकला, दोनदा थुंकला. इजा-बीजा-तीजा झाल्यावर तिज्यायला घोडा लावायची मला सवय. वाटच पाहत होतो. तिसऱ्यांदा थुंकला.
"झाली नक्षी काढून?", मी.
"काय?", तो.
"घरात असा कोपरा ठेवलायंस थुंकायला? का आई-बापाच्या ताटात थुंकतोस? नाही, म्हणलं, तीनदा थुंकलास, बघू काय कलाकारी आहे ते", मी.
"तुला काय, तू आपली बघ", तो.
"नाही कसंय ना भाऊ, टॅक्स आम्ही भरायचे, स्वछ भारत सेस आम्ही भरायचा आणि तू बापाची जहागिरी असल्यासारखं थुंकत फिरायचं म्हणजे जरा अवघड आहे, पण काय आहे ना, तुझा दोष नाही, तुझे आई-बाप भिकारडे असल्यावर तू तरी काय करणार?" मी.
हाणामारी लागायच्या आतच लोक मध्ये पडले आणि इतक्या वेळ स्वतः मागे पचापच थुंकलेल्या दोघा-तिघांनी त्याला ढकलपट्टी चालू केली. सगळीच पोरं बाजीरावाची औलाद ना इथे. त्यांना त्यांची जागा दाखवून शेवटी डोंबिवलीला उतरलो.

कसंय ना, माझ्या मते, स्वतः काही करायच्या थ्रेशोल्डला येईपर्यंत थांबणे म्हणजे संयम. स्वतः काही ईलाज करू शकत नसताना सहन करणे म्हणजे सहनशक्ती. काही करायची ईच्छा असताना, आणि मुळात त्याची गरज असताना शेपूट घालणे म्हणजे शहाणपण नाही, त्याला चुत्यागिरी म्हणतात.

बाकी, सौजन्याची आणि माणुसकीची एशितैशी.

- WedaPashi

1 comment:

  1. वा वा...मलाही अशा लोकांचा राग येतो आणि एखाद्या दिवशी असच करावसं वाटतं. क्वचित होतही. पण मी सौजन्याने भांडते. तुझ्या इतकं नाही भांडू शकत. लोक मुलगी म्हणून काय बोलतील असं वाटतं.

    ReplyDelete