एक फसलेला प्लॅन

      मी एरवीच एकटा फिरतो. मग त्यातले धोके, नफा-तोटा ह्या सगळ्या गोष्टींचं चर्वण-कीर्तन झालंय आधीही. माझ्या नशीबानं म्हणा किंवा  तोडक्या-मोडक्या अभ्यासानं म्हणा मी आजतागायत कधी सोलो ट्रेकला अवघड प्रसंगाच्या कात्रीत अडकलो नाहीये आणि त्यात वावगं वाटण्यासारखं काही नाहीये खरंतर. पण कधी वाट चुकणं कसं महाग पडू शकतं ह्याची परिणीती मला आज ना उद्या येणारच होती असं म्हणायला हरकत नाहीये.

      मुंबईतली नवी नोकरी म्हणजे डोक्याला गंज चढवून कटकट आणणारी होती. शेत नसणाऱ्यानं उगाच बैल विकत घेऊन दावणीला बांधून ठेवावेत अशी अवस्था. अन् त्यातही कधी सठी-माशी काम आलंच तर ते असं की 'वाळूत मुतले, न फेस ना पाणी', त्यात उल्हास म्हणजे फक्त दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी आणि त्यात महिन्यात ५ वीकेंड आले की त्या चिकट गुजरात्याचा फायदा. नेमकं तसंच झालं होतं. पाचवा आणि पहिला वीकेंड निरर्थक पाट्या टाकल्यावर डोक्याचा आणि मनाचा प्रोटोकॉल गंडल्यासारखं वाटायला लागलं. पावसाआधी येणाऱ्या ढगांची बातमी ऐकून मनावरचं मळभ दूर करायची कूणकूण लागली. साहजिकच सोलो ट्रेकचा प्लॅन शिजला.

      संथ टिकटिक करत तो शनिवारचा दिवस पुढे सरकला. 'बैल गेला, झोपा केला' करत पूर्ण दिवस चकाट्या पिटल्यावर, जोरात लागावी अन् नेमकं नाड्याला गाठ बसावी तसं ६ नंतर म्यानिजरला त्याचा हुद्दा गवासला. ऑसिलोस्कोप घेऊन माझ्या समोर हजर. त्याचं जोडं त्याच्या गळ्यात बांधून 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल' ह्या आविर्भावात हापिसातून निघालो ते म्यानिजरला त्याचे पितर आठवूनच.

      इथंच उशीर झाल्यानं पुढच्या सगळ्या प्लॅनला खो बसला होता. गाड्या कोंडून पडलेल्या प्रत्येक चौकात म्यानिजरला उचक्या देत तासाभरात कांजूरला पोहोचलो. लोकलमध्ये लोंबकळत घर गाठलं. विशेष सामान वागवायचं नसल्यानं बॅग पटकन भरली. घरची तोंडीपरीक्षा पास करून आता जाऊ की पहाटे जाऊ करत शेवटी ११ वाजता मी निघलोच. पावसाचं चिन्ह नव्हतं. ओळखीच्या आणि आवडत्या रस्त्यानं बाईक दामटवत २ तासात पळू गाठलं. गावात जाऊन सारी कुत्री उठवण्यापेक्षा गावाच्या सुरुवातीला असलेल्या मंदिरात पडी टाकायचं ठरवलं. बाजूच्या दादाला मी झोपत असल्याची माहिती देऊन मी झोपी गेलो.

      केवळ ढग पाहण्यासाठी रिठ्याच्या दारानं वर धकोबाला जाऊन दाऱ्या घाटानं खाली यायचं असा साधा आणि शब्दशः सरळ प्लॅन होता. त्यातलं रिठ्याचं दार मी केलं नव्हतं. अट अशी होती की ऊन वाढायच्या आतच धकोबा गाठलं तरंच ढग नाहीतर पोपट, त्यामुळे ६ ला उठून मी डोंगराची वाट धरली.

      गावामागेच एक ओढा लागतो, पावसाळा सोडल्यास एरवी तो कोरडा असतो. तो ओलांडून पुढे आलात की हलकी चढण लागते. हाती येईल तेवढ्या रानमेव्यावर ताव मारत मी पुढे सरकलो. मग एक कच्चा रस्ता लागतो. त्यावर उजवीकडे वळलात की पुन्हा पळू आणि डावीकडे माणसाचा उच्छाद! क्रिकेटचं मैदान भरेल एवढा जंगलाचा पट्टा गायब करून प्लॉट काढलेत. ही वीकेंड होम - सेकेंड होमची कंसेप्टच मला मूळी पचत नाही. ह्या असल्या पोकळ अन् फाफट प्रकारामुळे किमती आसमानाला भिडल्यात. परिणामी, म्हस्याचं मुरबाड, मुरबाडचं बदलापुर होत चाललंय. पैसा पाहिजे म्हणून मरा, त्यातनं तरलात तर मग स्वतःला तारण ठेवून कर्ज घ्या, त्यातनं थोडं टक्कल बाहेर पडलं की अक्कल लढवा आणि दुसरं घर घ्या. प्रत्येकाचं दुसरं घर.. त्यासाठी अतोनात लाकूडतोड, बाला रेती पाहिजेन म्हणून नदीतनं वाळू/रेती उपसा. प्लॉट पडले म्हणून रस्ता. रस्ता पाहिजे म्हणून कुर्हाड, कुर्हाड झाली की जे.सी.बी.! हे सर्व निसर्गाच्या सानिद्ध्यात पाहिजे असला अट्टहास म्हणजे तर वरतांड! निसर्गाच्या जवळ जाण्याच्या हाव्व्यासापोटी आपण निसर्गाचीच आई-माई एक करतोय. निसर्गाचं कसंय की ते प्रकरण नुकतेच पाय फुटलेल्या कुत्र्याच्या पिलासारखं आहे. आपल्याला त्याच्या जवळ जायचं तर असतं, गोंजारायचं तर असतं, पण जेवढं जवळ जाल तेवढं ते लांब पळतं आणि मग आपण जरा काय अग्रेशन दाखवलं, हात मारला की ते लागतं केकाटायला.

      अररर! भरकटलो. माफी असावी. नेमक्या ह्याच विचारात दाऱ्या घाटाच्या दिशेनं चालत आलो. माहितीप्रमाणं दाऱ्याची वाट सोडून डाव्या हाताला वळालो. १५ मिनिटानं वाट अरुंद होत होत पार गचपणातच गेली. दाऱ्या घाटाची नाळ आता उजवीकडे लपली होती. तसंच थोडं पुढे आलो की गचपण थोडं कमी झालं कारण मी एका ओढ्यापाशी आलो होतो. त्याच ओढ्यातनं मला वर जायचं होतं. तिथंच थोडा नाश्ता करून मी वर जायला सुरुवात केली. एक टप्पा - तो चढून वर. मग थोडा मारिओ खेळावा लागला. मग दुसरा टप्पा - तो चढून वर. ह्यात टप्पा म्हणजे काहीच अवघड नाही. कोणत्याही नाळेत एरवीच ते लहान १० फूटी पॅच असतात तसे. मग डावीकडे घुसलो. अजून थोडं वर गेलो की मग तिसरा टप्पा, जरा विचित्र. तिथं पाणी. गाडीचं गरम रेडिएटर जरा थंड करून मग त्यावर पाणी ओतलं. जरा दम खाऊन सुरुवात करणार तितक्यात एक आजोबा आले.

      संभाषण "इथं कशाला घालतोयस" पासून सुरु झाल्यावरंच मला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय किंवा तसं होण्याच्या मार्गावर आहे. "आरं तू चुकलायंस" करत त्यांनी मला खाली येण्याचा सल्ला दिला. मी ठाम. Huh! The day has just begun. Retreating from the mountain in the early hours of a long summer day is very unlike of me. Aberrant!

      मग मी हट्टाने त्यांना वाट विचारलीच. त्यांनी मला डावीकडे खाली जायला सांगितलं. मी कोड्यात. ते गेल्यावर मी डोक्यात रंगवलेले नकाशे आणि माझं GPS लोकेशन ह्यावर विचार केला आणि मी बरोबर वाटेवर होतो असं एकमत झालं. ८ वाजले होते. पुढे सरकलो. अगदी पाचच मिनिटं चढलो आणि वाट गायब. बराच वेळ इथून-तिथून प्रयत्न केला वाट शोधायचा. वर काय मी कसापण गेलो असतो, पण वाटेवर राहणं गरजेचं होतं. मग आजोबांनी संगितल्याप्रमाणे थोडं खाली आलो. तिथं पट्टयातून फिरणाऱ्या बऱ्याच वाटा होत्या पण त्यातून डावीकडे जाणं हे निव्वळ चूक होतं. रिठ्याचं दार ज्या घळीत होतं त्या घळीतून उगाच बाहेर येणं मला पटतच नव्हतं. पण आजोबांनी मनात चुकचुकणारी पाल सोडली होती, शंकेचा भूंगा मागे सोडला होता. तरी recon म्हणून मी डावीकडल्या तब्बल ४ नाळा पार तोंडाशी जाऊ-जाऊ पाहिल्या.

      शेवटी सावलीत थांबलो तेव्हा १० वाजून गेले होते. ३ लीटर पाणी शिल्लक होतं. तसं असलं तरी वर जाण्यात मला काडीमात्र इंटरस्ट नव्हता. मी जिथे होतो तिथून वरच्या पाण्याशी पोहोचायला तासभर नक्कीच गेला असता आणि मी जे ढग पाहायला आलो होतो ते केव्हाच गायब झाले होते. तिथं सिद्धावर ढगांचा गराडा दिसत होता. अनोळखी नाळेत पाऊस आला असता काय तारांबळ उडेल ह्या कल्पनेपोटी मी माघार घेतली. प्लॅन फसला होता. मी हरवलो नव्हतो, मुळीच नाही. जंगलात आपण कुठे आहोत आणि कुठे जायचंय ह्याचा गंध नसणे म्हणजे हरवणे. मला मी कुठे आहे ह्याचा अंदाज होताच. कोणत्या नाळेतून वर जायचं होतं ते ही पुरेपूर माहीत झालं होतं. आजोबा भेटले नसते तर मी सद्ध्या धकोबाला बसलो असतो. असो, गाव जेमतेम तासाभरावर होतं. मग पुन्हा टेकायला दगड पाहून सावली हरली आणि मागल्या सोलो ट्रेकचा ब्लॉग लिहायला घेतला. त्यात गुलाम अलींनी मला पार शांत करून सोडलं.

      एक अजनबी झोंकेने जब पूछा मेरे ग़म का सबब,
      सेहराके भीगी रेथ पर मैंने लिखा, आवारगी!

      १२ वाजता तिथून निघालो आणि गावाजवळ आलो. तिथं प्लॉटपाशी दादा भेटले. त्यांना सारी हकीकत सांगितली आणि त्यांनीही मी वाटेवर होतो ते च सांगितलं. 'चपटी'वाल्या आजोबांनी मला नक्कीच वाटेवरून हुकवलं होतं.  सोबत आणलेल्या ब्रेड आणि बटरच्या बदल्यात भाकरी, दही, इंद्रायणीचा भात आणि बटाट्याचं कालवण असली भारी डील वरपून मी घराकडे निघालो. वर न जाण्याचा निर्णय योग्यच होता ह्या गोष्टीवर शिक्का बसला तो मिल्ह्यात लागलेल्या पावसानं. वाटेत पिकअप-ड्रॉप सर्विस देत-देत घर गाठलं.

      भरपूर काही शिकलो होतो ह्या ट्रेकमध्ये. जिद्दीने करायचं ठरवलंच असतं तर रिठ्याचं दार झालंही असतं. पण कधीकधी माघार कशी घ्यावी ह्याचा धडा मिळाला होता.

Mountains will always be there, trick is to make sure you are too. ~ Harvey Voge.

      मी हे असंख्य वेळा ऐकलं आहे कि ट्रेकिंग हे एकट्यानं नसावंच, त्रिकुट-चौकट तर असावीच. ह्या ट्रेकच ही तसं म्हणता येईल. उतरताना किंवा चढताना पडला असतास तर काय? वाटेत काही चावलं असतं तर काय? मग नेटवर्क नसतं तर काय? हे करून मिळालं तरी काय? आणि असंख्य तत्सम प्रश्न. खरं सांगायचं झालं तरं हे प्रश्न काहींना हा ब्लॉग वाचल्यावर पडू शकतात, फरक एवढाच आहे कि हे प्रश्न मला ट्रेक सुरु करायच्या आधी पडतात, आणि होय, तरीही मी जातो.

'का?' ह्या प्रश्नाची बरीच उत्तरं आहेत.
'नाही गेलास तर नाही का चालणार?' ह्याचं एकचं उत्तर : नाही चालणार!
'पुन्हा जाशील का?' ह्याचं उत्तर माझ्याकडं पण नाही.

हं, माझ्या सोलो ट्रेक बद्दल तुम्हाला काही आक्षेप असेल तर तसं सौम्य आणि तुम्हालाच शोभेल अश्या शब्दात वैयक्तिक संदेशाद्वारे सांगा, चर्चा करू. उद्धटपणे व्यक्त केलेल्या मताला किंवा टीकेला मधले बोट किंवा आरसा दाखवण्यात येईल.

I do not intend to motivate/discourage anyone from trekking/solo-trekking. I believe this and every other trek has taught me a handful of things. I simply don't expect anyone to pack his/her sack and set off to a solo trek after reading this or any of my blogs.