गाडा

पावसापासून वाचवण्यासाठी पॅकेट बॅगेत ठेवून झीप (बॅगेची) लावून "कांजूर 15, कांजूर 15" अशी आरोळी ठोकत असलेल्या बसकड धूम ठोकली, मोबाईल काही हातातून सोडवेना.
बसमध्ये धक्के खात, स्वतः पेक्ष्या मोबाईलला जास्त जपत प्रवास सुरु झाला. वाटेत एक शाळा आहे, तिथं पण गर्दी, हॉर्न वाजवू नका वगैरे वगैरे तत्सम सुचनांकडे सपशेल दुर्लक्ष्य करत रॅट-रेस चालूच होती. जवळ 1000 रुपये आहेत म्हणल्यावर आज फ्लोटर घेता येईल, अरे मग कोणती घ्यायची असल्या फालतू विचारात मी गर्क होतो. तितक्यातच माझं लक्ष्य एका पोराकडे गेलं. ते कारटं गळ्यातला टाय ढीला करून मैदानात साचलेल्या पाण्याकडं धावत सुटलं होतं, दूरवर त्याची सॅक घेऊन हताशपणे त्याकडं पाहणारी त्याची आई! ते पाहून लहानपण नाही आठवलं तर नवल!

मग मी थेट शाळेतल्या पंदेरे बाईंच्या तासात पोहोचलो. मला आजवर झोडणार्यांमध्ये पावसापाठोपाठ ह्या बाईंचा नंबर लागेल. अर्थातच मी काही कमी छळीक नव्हतो. स्वप्निल काळेच्या डुक्कर मुसंड्या काय आणि अवधूत चाळकेला सतरंजीत गुंडाळून मारणे काय किंवा तेजल गायकवाडला दंडावर चावणे असो, ह्या निरागस कृत्यांपासून ते थेट रहाणेसोबत साजरा केलेला सेंड-ऑफ़ इथवरचा प्रवास फार मोठा होता. ती सकाळी उठायच्या गडबड, मग तोंडात ब्रश ठेवून काढलेली डुलकी, त्यावर आईने ओरडून सांगणे "पश्या पाणी काढलयं!".. माझे केस कधी विंचरले गेलेच नाहीत..ते स्लीपर पायात ढकलून शाळेत पळणं, मग वर्गात जाऊन स्वप्निल काळे, निशांत समेळ आणि आदित्य कल्लोळकरच्या मधली जागा पकडणे, ते डोक्यावरून जाणारं गणित, चाकाचा शोध नी ती अणकुचिदार हत्यारं आणि काय काय. मधल्या सुट्टीत मटकीची उसळ, खान्देशी लोणच्याच्या बदल्यात काळेने दाण्याच्या कुटाच्या चटणीवर मारलेला ताव, काल रात्री सिनेमात अक्षय कुमारने दिलिप ताहिल किंवा मोहन जोशीला मारलेली किक हा गाशा गुंडाळून उरल्या वेळेत चोर-पोलिस खेळणं, किंवा नजर चूकवून पुलावरून रेल्वे पाहणे काय, मग त्यात 2 लोकल ऐवजी एक एक्सप्रेस दिसली तर मग चांदीच चांदी. ह्या एका कारणास्तव उद्यान आणि कोयना आमच्यासाठी जगात भारी गाडया होत्या. मस्ती एवढी होती की झोपेचा प्रश्नच आला नाही, मग ते रांगेत सू ला जाणे काय, 100 पानी वही विमानात इन्वेस्ट करणे काय, मग कधी त्याचं रॉकेट तर कधी हळू उडणारे Cessena काय.

प्रोमोशन-डिमोशन तिथेही होतंच की: सतरंजी ते बाक, 100 पानी वह्या ते 200 पानी वह्या, चोर-पोलिस ते खो-खो, नाईलाजनं स्वप्निल काळे ऐवजी बेंचमेट म्हणून मानसी करमरकर येणं काय, अभ्यासात तसा मी कच्चाच. मग त्या चाफेकर बाईंच्या तासाला वर्गाबाहेर उभे राहणे काय, तिथं उभारून बाहेरचा पाऊस पाहणे काय. मग हळूहळू अभ्यास वाढत गेला, मित्रही वाढले. आज मोबाईल मध्ये असलेल्या क्रिकबझवर स्कोअर पाहण्यापेक्षा TV वाल्या दुकानात स्कोअर पाहण्यात जास्त मजा होती.
बसमध्ये ड्रायवर काकांच्या मागच्या सिटवर उलटे गूढघ्यावर बसून समोरचं पाहण्याची सर धावत पकडलेल्या लोकल मधल्या सीट ला कधी यावी! कसंय ना, तेव्हा खिशात दमडी नसायची तरी आपण दुनियेला फाट्यावर मारायचो आणि आज म्हणे आपण दुनियादारीत अडकलो आहोत. नाही, चूक. तेव्हाही दुनियादारी होती च. फक्त ते वजन आपल्या आई-बाबांनी अलगद पेलून धरलं होतं.. आता जेव्हा काही नगण्य अंशी ते आपण पेलत आहोत, तर आपल्याला जुने दिवस आठवत आहेत.

हल्ली खूप लोक दिसले असं शाळेतले दिवस आठवून गिरवणारे. माझा मुद्दा हा नाहीये की माझं शालेय जीवन काय भारी होतं आणि आता मुलांचं कसं कमी मजेचं आहे.

Change is the only constant! आता आयुष्य अपग्रेड करून सोपं करण्याच्या नादात आपण जर त्यातली सिंप्लिसिटी हरपत असू तर ती आपली चूक. पाऊस तर आजही पडतोय, मैदानात पाणी आज ही सचतं, कागदाच्या होड्या-विमानं आजही बनू शकतात.. आपणच बदललोय.



1 comment: