असंच काहीतरी खरडलेलं

शनिवारची रात्र...थोडासा थकलेलोच..एक शांत खोली..तिच्यासोबत गप्पा मारून झाल्यावर एकटा निपचित पडलेला जीव. MSEB च्या कृपेने हळूहळू फिरणारा पंखा. बाहेर अगदी Typical मराठवाडी पाऊस..."पडतोय हेच नशीब म्हणायला लावणारा".
झोप काही लागेना. म्हणलं जरा गाणी ऐकू, झोप येते का पाहू. ज्यावर नुकतेच लोकांचे FB वर ट्रेकचे Updates पहिले त्याच बटाट्या mobile वर गाणी लावली. लावली तोच संदीप खरेने लिहिलेलं आणि सलीलने गायलेलं गाणं वाजलं..
म्हणे,

आता आता छाती केवळ भीती साठवते..
डोंगर बघता उंची नाही, खोली आठवते...


च्या मारी ह्यांच्या. काय लिखाण आहे! थेट विषयाला हात घालणारं..
म्हणतात ना, ट्रेकर लोकांची जात च वेगळी..ह्याचं ही काही तसंच आहे, ह्यांना गाणी ऐकवा आणि फोटो दाखवा अन मग हे येडं जागीच हरवतं. मग तिथं सलीलने गायलेल्या गाण्यातले डोंगर राहतात बाजूलाच, अन हेय येडं दरवेळेप्रमाणे कुठल्यातरी डोंगर-दर्यांत आणि जास्त करून एखाद्या घळीत हरवतं. मग काय, उगाच तो भिरभिरणारा वारा, एक मस्त पेटलेली शेकोटी आणि त्यात 'जवळ असून लांब असणारे, किंवा लांब असून जवळ असणारे' ट्रेकाडे मित्रं आठवतात. मैफील जमायला वेळ लागत नाही. ह्याचं कारण असं कि ही आणि ह्यासारखी अनेक गाणी गाऊन ह्या कार्ट्याने रात्री जागवलेल्या असतात, बसमध्ये अंताक्षरीत किल्ला लढवलेला असतो, तर कधी थकवा दूर पळवलेला असतो. त्यात ते रात्रीचे गाणे तर सगळ्यात भारी. न विसरणारे.. साला शेकोटीसमोर ही गाणी गाताना शब्द कसे अचूक आठवायचे, आणि आता, ही गाणी ऐकून त्या रात्री डोळ्यासमोर दंगा करतात. सामरद गावातली 'ती' शेकोटी आठवल्यावाचून राहात नाही.
तिथे सलीलच चालूच असतं...

कधी दाटू येत पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा..
असे हालते आत हळुवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्यांचा..
आताशा असे हे मला काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते..

फक्त दोनच वर्षांपूर्वी नियमित रानोमाळ बोंबलत भटकायचं चंद्रीयेड लागलेलं हे येडं, आजही मुंबईहून येताना लागणारा, पूर्ण एक महिना रोज मुंबई-पुणे-मुंबई करताना पाहिलेला खंडाळा घाट, पंधरा वेळा इकडून-तिकडून चढलेलं, पिंजून काढलेलं राजमाचीच जंगल थोबड्याचा "आ" वासून पाहतं. जादूच आहे. राजमाची चे तर हजार किस्से आहेत. मी लिहित बसलो अन तुम्ही वाचत बसलात तर कुठे Server Timed-Out व्हायचा..

मग गाडी झुकझुक करत लोणावळ्याच्या आठवणी बगलेत मारून पुण्यात येते. कामशेत हून पुणे येईपर्यंत हे येडं कुठेतरी ढाक च्या जंगलात, किंवा मांजरसुम्ब्याजवळ किंवा कुसूरच्या पठारावर हुंडारत असतं. आता पुण्याच्या गोष्टी skip करतो.
वाटतंय पुण्यापर्यंत येऊनच सगळा का अडतंय?
पुढचा प्रवास - पुणे ते तुळजापूर.. निव्वळ रखरखाट...

'ट्रेक ला जाणं सोडा, कड्यावरून डोकवायची भूक तिथं बोडकं टेकाड पाहून भागवावी लागणार' ही भयंकर जाणीव होते. अन मग, गांधी-टोपी घातलेल्या, गावंडळ म्हातार्यानं चुना लावून तंबाखू मळावी तसा कचरा होतो ह्या सगळ्या आठवणींचा, उरते ती फक्त भयंकर जाणीव आणि रखरखाट. मग गाडी 'कशासाठी?..पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी..' करत करत नको तिथं येते.. खंडाळ्याच्या आठवणी एव्हाना मनात खोल खड्डा करून बसलेल्या असतात..

शेकोटी तर कधीची विझून गेलेली, आणि हरवलेलं हे येडं जागेवर येतं तेव्हा पुन्हा होतं तिथंच, आपल्या खोलीत असतं.. आता जरा जास्तच एकटं..सलीलच गाणं पण इतक्यात संपलेलं असतं. मग काय, दुसरं गाणं, दुसर्या ट्रेक च्या आठवणीत हरवून ऐकायची किंवा ऐकून हरवण्याची सवयच झाली आहे म्हणा..तिथं ट्रेकर्स च्या टोळ्या त्या-त्या पायथ्याच्या आडगावी, आडरात्री पोहोचतात..आणि इथ हे येडं जी गाणी गात रात्रभर जागायचं, तीच गाणी ऐकत, Every Dog has his day म्हणून आपलीच समजूत काढत कधी झोपी जातं त्याचं त्यालाच माहित.